प्रतिनिधी, पालघर
माहीम (ता. पालघर) येथील भुवनेश कीर्तने विद्यालयात सोमवारी दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेगबहादूर साहेबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री. मनकवल चड्डाजी उर्फ ‘डायमंड चड्डा’ हे उपस्थित होते. मूळचे दिल्लीचे असले तरी पालघर हीच आपली कर्मभूमी मानणारे डायमंड चड्डाजी हे सुप्रसिद्ध समाजसेवक आहेत. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना श्री गुरु तेगबहादूर साहेबजी यांच्या त्याग, बलिदान आणि धर्मरक्षणासाठी दिलेल्या महान शहादतीबद्दल सविस्तर माहिती दिली. लहानपणापासूनचा जीवनप्रवास कथारूप पद्धतीने मांडल्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांचे भाषण अत्यंत लक्षपूर्वक ऐकले.
भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात सर्व धर्मांना समान महत्त्व देण्यात येते, हे अशा उपक्रमांमधून अधोरेखित होत असून भारत सरकारच्या मार्गदर्शनाखाली साजरी होणारी ही शताब्दी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी ठरली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळा प्रशासन, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त करण्यात आले.


